Wednesday, January 13, 2010

डॉ. अमोल कोल्हे यांना ‘जुन्नर भूषण’ पुरस्कार

जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘जुन्नरभूषण’ पुरस्कारासाठी यंदा राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवरायांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (तीन ऑक्टोबर) पिंपरी येथे समारंभपूर्वक कोल्हे यांना हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष रोहित खर्गे, संपर्कप्रमुख उल्हास पानसरे यांनी ही माहिती दिली. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संस्थेची स्थापना झाली असून तीन ऑक्टोबरला संस्थेचा नववा वर्धापनदिन आहे. यानिमित्त संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शनिवारी दुपारी चार वाजता हा समारंभ होणार आहे. महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांना जुन्नरभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी सिनेअभिनेते भरत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याखेरीज, इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शाळांचाही गौरव करण्यात येणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.
अभिनयात स्थिरावतोय- अमोल कोल्हे

डॉक्टर ते अभिनेता असा माझा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. स्थिर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातून मी अभिनयाच्या क्षेत्रात आलो आणि आता कुठे या क्षेत्रात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे स्थिरावतो आहे. अशावेळी अस्थिर असलेल्या राजकारणात जाण्याचा अजिबात विचार नसल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

नाळे येथील दत्त मंदिर उत्सव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ. कोल्हे यांनी 'मटा'शी बोलताना अनेक विषयांवर आपली मते मांडली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या मी तीन नाटकांच्या व चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतोय. त्यातून चांगले पटले तर ते लोकांसमोर घेऊन येईन. शिवरायांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारले त्यामुळे माझ्या या प्रतिमेला छेद न देता वेगळे घेऊन येण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील.

'शंभूराजे' नाटकाविषयी बोलताना ते म्हणाले की, शंभूराजेची भूमिका साकारणे हे माझ्यातील अभिनेत्याला आव्हान होते. मालिकेतील शिवराय व नाटकातील शंभूराजे हे पूर्णपणे वेगळे होते असे प्रेक्षकांनी नाटक पाहिल्यानंतर सांगितले ही मला दिलेली पोचपावती आहे. माझ्या या वाटचालीत प्रेक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. मी सध्या मालिकांपेक्षा चित्रपटांवर काम करतोय. हिंदी चित्रपटांच्या अनेक ऑफर मला आल्या असल्या तरी मी त्या नाकारल्या आहेत. तरी त्यात जर दजेर्दार काही आले तर जरूर त्याचा स्वीकार करीन. सध्या शंभूराजे नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून एका महिन्यात नाटकाचे २० प्रयोग होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

राजकारणाविषयी चर्चा

राजकारणात यायला मला आवडेल. राजकारण वाईट आहे, असे बोलले जाते. मात्र, सगळेच राजकारणी वाईट असू शकत नाहीत. जर असे असते तर शंभर कोटींच्या देशात यादवी माजली असती, मात्र असे झालेले नाही. देश सुरळीत असून विकासाच्या वाटेवर चालला आहे. म्हणजे राजकारणात काही चांगले माणसे निश्चित आहेत व या चांगल्या माणसांना मदत करण्यासाठी मला राजकारणात जायचे असले तरी परिपक्वता आल्यानंतरच पुढील निर्णय मी घेईन असे त्यांनी अखेरीस सांगितले.